छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगरमध्ये प्रेमविवाहातून आॅनर किलिंगची घटना घडली होती. सासरा आणि चुलत मेव्हण्याने चाकूने भाेसकून जावई अमित मुरलीधर साळुंके याचा खून केला होता. या प्रकरणी शनिवारी (दि.२७) चुलत मेव्हणा अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही याला अटक करण्यात आली. तर सासरा फरार होता. त्यानंतर आज (दि.२८) पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही याला अटक केली. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्यामुळे पोलिसांनी दुसरा जावई स्वप्नील पटेकर (२८, रा. जालना) यालाही अटक केली. या प्रकरणात आता आरोपींची संख्या तीन झाली आहे.
अमित साळुंके याने २ मे रोजी विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्याशी पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे अमित आणि विद्या हे महिनाभर पुण्यात राहिले. मात्र, गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या धमक्या सुरूच होत्या. सैराट सिनेमासारखा अमितचा काटा काढू, असे ते नेहमी धमकावत होते. पुण्यासारख्या ठिकाणी मुलाला गाठून मारले तर मदतही मिळायची नाही. त्यामुळे अमितच्या कुटुंबीयांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरात बोलावून घेतले. लग्न होऊन अवघे अडीच महिने होताच गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी १४ जुलैच्या रात्री अमितला गाठून त्याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी असलेल्या अमितवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. २५ जुलैला अमितने अखेरचा श्वास घेतला.
जावयाचा खून प्रकरणातील चुलत मेव्हणा अप्पासाहेब कीर्तिशाही याला उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने शनिवारी (दि.२७) अटक केली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) जवाहनगर पोलिसांनी गीताराम कीर्तिशाही यालाही बेड्या ठोकल्या. तसेच तो जालन्याला ज्या जावयाकडे लपून बसला होता, त्या जावयालाही पोलिसांनी आरोपी केले. त्यालाही अटक केली. या तिन्ही आरोपींना १ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन यांनी दिली.