छत्रपती संभाजीनगर : आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहात तहकूब स्थायी समिती सभा झाली. यात नाले, कचरा, अतिक्रमण यासह इतर विषयांवर सदस्यांनी भूमिका मांडल्यानंतर अतिक्रमण हटावची कारवाई करण्याचे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी दिले. तसेच कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ३ हजार २२४ कोटींचे अंदाजपत्रक तयार करून तो २५ मार्च रोजी स्थायी समितीचे सभापती मकरिये यांना सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यामुळे ही सभा तहकूब करून शनिवारी आयोजित करण्याचे सभापतींनी दिले होते. त्यानुसार शनिवारी ही सभा घेण्यात आली. यात भाजपच्या कमल नरोटे यांनी अंबिकानगर भागातील नाला स्वच्छ करण्याची मागणी केली.
या नाल्यात कचरा टाकला जातो, त्यामुळे श्वान येतात, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी आदी मुद्दे मांडले. अॅड. माधुरी अदवंत यांनी आझाद चौक ते सावरकर चौकापर्यंत बांधकाम साहित्याची वाहने थांबतात, हा रस्ता महापालिकेने करारावर दिला आहे का, असा प्रश्न केला. चिकलठाणा रस्ता रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या पाडापाडीतील ४० हून अधिक मालमत्त धारकांना मावेजा देण्यात यावा, अशी मागणी सदस्य रवी कावडे यांनी केली. दरम्यान, शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत सभापती मकरिये यांनी प्रशासनाला आदेश दिले. तसेच कचरा संकलनाच्या कामावर भर देण्याची सूचना केली.
सातारा-देवळाईसाठी १५० कोटी द्या
अप्पासाहेब हिवाळे यांनी सातारा-देवळाई परिसरातील खुल्या जागांचा विकास करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी हवा, तसेच सातारा-देवळाई भागासाठी किमान १५० कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद करावी. या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. नागरिक कर भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे मोफत टँकर देण्यासाठी तरतूद करावी, बीड बायपासवर वाहतूक सिग्नल बसविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. श्वेता त्रिवेदी यांनी स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्याची मागणी केली.