छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना अद्ययावत सोयीसुविधा देण्यासोबतच शहराचे औद्योगिक पोटॅन्शिअल ओळखून चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रधान्य देण्यात येईल, असे महापालिकेचे नवे आयुक्त अमोल येडगे सांगितले. शनिवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी मावळते आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून पदभार घेतला.
प्रशासकीय करिअरची सुरुवात ही उपविभागीय अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागातूनच झाली आहे. त्यामुळे हा विभाग आपल्यासाठी नवा नाही. यापूर्वी बीड जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यावेळी जी. श्रीकांत हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. पुन्हा याच विभागात काम करण्याची संधी शासनाने दिली आहे.
महापालिकेत पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बरेच काही शिकण्यासोबतच शहरवासीयांना चांगल्या सुविधा कशा देता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी शहरात अतिशय चांगले काम केले आहे. चांगल्या योजना राबविल्या आहेत. त्यांचे हे काम तसेच पुढे नेणार असून शहरातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल, असेही ते नवे आयुक्त येडगे म्हणाले. महापालिका आयुक्त म्हणून जी कर्तव्य आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या योजनेतून पाणी देऊ शकलो नाही हीच खंत : जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरवासीयांना मुबलक आणि दररोज पाणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रशासक काळात सर्वाधिक प्रयत्न करून हे काम पूर्ण करण्यावर भर दिला. मात्र, २ वर्षे ११ महिने १ दिवस या कालवधीत योजना पहिल्या टप्प्यापर्यंत पूर्ण करता आली. परंतु, शहरवासीयांना प्रत्यक्षात पाणी देऊ शकलो नाही, असे म्हणत आयुक्त जी. श्रीकांत यांनी खंत व्यक्त केली.
प्रशासक काळात शहरवासीयांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. सफारी पार्क, ३१७ कोटींचे काँक्रिट रस्ते, उद्यान अद्ययावत करणे, दुभाजकांचे सुशोभीकरण, पथदिवे, ड्रेनेज लाईन, कचरा प्रकल्पाची नवी निविदा प्रक्रिया यासह इतर कामांचा समावेश आहे. महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष लक्ष दिले. कर वसुली वाढविली, असेही ते म्हणाले. सध्या पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी वाढीव पाणी देण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात शहराला वाढीव पाणी देणे शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले.