छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवासाठी घराघरांत साफसफाईची लगबग सुरू असतानाच शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत रविवारी (दि.१३) सकाळी विघ्न निर्माण झाले. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ साडेआठच्या सुमारास शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली.
काही क्षणांतच फुटलेल्या वाहिनीतून पाण्याचे उंच फवारे उडू लागल्याने परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ वाहिनीतील पाणी बंद केल्याने सकाळी नऊपासून शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद झाला. काही भागांना पुढील टप्प्यात कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असून, नियमित वेळापत्रकही पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत शहरासाठी २७४० कोटी रुपये खूर्चन नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून सध्या सुमारे ८० एमएलडी पाणी घेतले जाते. त्यापैकी ५० एमएलडी शहरासाठी, तर ३० एमएलडी पाइपलाइन स्कॉरिंगसाठी वापरले जाते. ९०० मिमी वाहिनीतून सुमारे ५० एमएलडी पाणी मिळते. जुन्या आणि नवीन योजनांच्या माध्यमातून शहराला दररोज सुमारे २०० ते २१० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.
सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मनपाकडून अटोकाट प्रयत्न केले जात आहे. मात्र रविवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान फारोळा येथे १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. गणेशोत्सवाच्या अवघ्या दोन दिवस आधी हा प्रकार घडल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
दरम्यान, जलवाहिनी रस्त्याच्या लगत फुटल्यामुळे पैठण संभाजीनगर मार्गावरील वाहतुकीलाही जलवाहिनी काही काळ फटका बसला. मात्र महापालिकेकडून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता आशिष वाणी आणि कनिष्ठ अभियंता सुभाष लहाडे यांच्या देखरेखीखाली कंत्राटदार योगेश मते यांच्या पथकाने दुपारनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरूच होते.
सणासुदीत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान
एकीकडे ९०० मिमी वाहिनीच्या दुरुस्तीमुळे उपलब्ध पाण्यात घट झाली असताना आता १२०० मिमी मुख्य वाहिनी फुटल्याने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची घरसफाई सुरू आहे. अशा वेळी पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. जलवाहिनी फुटीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.
९०० मिमी वाहिनी आधीच दुरुस्तीत
शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ९०० मिमी व्यासाच्या आणखी एका जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यामुळे या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा आधीच कमी झाला आहे. त्यातच आता १२०० मिमी मुख्य वाहिनी बंद करावी लागल्याने दोन्हींचा परिणाम एकाचवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे अनेक भागांचे पाणीपुरवठ्याचे टप्पे उशिराने होण्याची शक्यता आहे.