छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात हत्तीरोगाचे अस्तित्व कायम असून, ग्रामीण भागात हत्तीपायाचे ४७ तर महापालिका क्षेत्रात २२ असे एकूण ६९ हत्तीपाय रुग्ण नोंदलेले आहेत. यापैकी जिल्ह्यातील ३९ आणि महापालिका क्षेत्रातील १९, असे एकूण ५८ रुग्ण ग्रेड-३ व त्यावरील श्रेणीतील आहेत. शासन निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष हत्तीरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात विशेष हत्तीरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
गावपातळीवर तपासणी करून हत्तीरोगाचे संशयित व बाधित रुग्ण शोधणे, पूर्वी निदान झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणे, त्यांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच हत्तीरोगाच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली हत्तीरोग अधिकारी डॉ. वैशाली पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राहुल चव्हाण व सहायक संचालक डॉ. रेखा भंडारी यांच्या समन्वयाने मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
उपलब्ध नोंदीनुसार जिल्ह्यात तपासणी पूर्ण झालेले ३९ व महापालिका क्षेत्रात १९, असे एकूण ५८ आहेत. प्रमाणपत्र प्रदान केलेले रुग्णही जिल्ह्यात ३९ व महापालिका क्षेत्रात १९, असे एकूण ५८ आहेत. सर्व रुग्णांना मागील वर्षीच एमएमडीपी किट वाटप केलेले आहे.
दरम्यान आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर मायक्रोफायलेरिया रक्तात सापडण्याच्या निश्चित कालावधीबाबत माहिती नाही. पण, हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी साधारणतः ८ ते १६ महिन्यांचा कालावधी लागतो.
हत्तीरोग म्हणजे काय ?
हत्तीरोग हा फायलेरियल परजीवीमुळे होणारा आणि डासांमार्फत पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे शरीरातील लसिका वाहिन्यांवर परिणाम होऊन पाय, हात किंवा जननेंद्रियांच्या भागात सूज येऊ शकते. दीर्घकाळ योग्य काळजी व उपचार न घेतल्यास ही सूज वाढून हत्तीपायाची विकृती निर्माण होऊ शकते. संसर्ग झाल्यानंतर अनेक वेळा सुरुवातीच्या काळात स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे शोध मोहिमेत नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.