छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमधील रस्सीखेच अजूनही संपलेली नाही. गेल्यावेळी युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. मात्र, आता आमचे संख्याबळ अधिक असल्याचे सांगत भाजपने त्यावर दावा ठोकला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपत आहे. त्याआधी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेतील 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे. यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 1 जून 2026 आहे. मात्र, महायुतीत औरंगाबाद-जालना मतदारसंघाची जागा कोण लढविणार हे अजूनही ठरलेले नाही. गेल्यावेळी भाजपचे संख्याबळ अधिक असूनही युतीत ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती. आता यावेळी शिवसेना ही जागा मिळविण्यासाठी आग््राही आहे.
दुसरीकडे भाजपने या मतदारसंघात आमचे संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्यांना वरिष्ठांच्या आदेशांची प्रतिक्षा आहे.
32 जणांनी घेतले अर्ज
औरंगाबाद-जालना मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 32 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र, अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही. शिवसेनेकडून रमेश पवार, नंदकुमार घोडेले, माजी मंत्री अब्दूल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी अर्ज घेतले आहेत. तर भाजपकडून अद्याप कोणीही अर्ज घेतलेला नाही. मंगळवार, 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार असून गुरवार, 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर गुरूवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून रोजी करण्यात येईल.