छत्रपती संभाजीनगर : बुलडोजर चालवण्यात तत्पर असलेले महापालिका प्रशासन श्रीमंतांच्या मालमत्तांना बगल का, अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत का दाखवत नाही, असा संतप्त सवाल शुक्रवारी (दि. ८) सकाळी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी दिव्यांगसाठी प्रलंबित निधी आणि घरकुलाच्या मागण्यांवर मनपा प्रशासनाने १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एका दिव्यांग महिलेच्या माठांवर बुलडोजर चालवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी धाव घेत पारखे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.
गरीब व हातावर पोट असलेल्या लोकांवर कारवाई करताना प्रशासन तातडीने धडक मोहीम राबवते. मात्र मोठ्या व प्रभावशाली अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची हिंमत का दाखवली जात नाही? श्रीमंतांसाठी अधिकाऱ्यांनी हातात बांगड्या घातल्या का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच दिव्यांगांसाठीच्या योजनांबाबतही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी राखीव निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलाच नाही. अनेक योजना केवळ कागदोपत्रीच राहिल्या असून प्रशासनाने या घटकाकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेतील दुहेरी निकषांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बाधित महिलेला मदतीचे आश्वासन
पारखे यांच्या नुकसानीची दखल घेत त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबासाठी रोजगार किंवा उत्पन्नाचा पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात कायमस्वरूपी घरकुल मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आ. कडू यांनी दिले.
१५ दिवसांत निर्णय घ्या
दिव्यांगांसाठी प्रलंबित निधी तसेच घरकुलाच्या मागण्यांवर महापालिकेने पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.