Ambadas Danve accused of bargaining again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा एकदा सौदेबाजीचे आरोप झाले आहेत. जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत भाजपला फायदा देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून दानवे यांनी पक्षाच्या सदस्यांना तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळीही पक्षाच्या एका जिल्हा परिषद सदस्याने दानवे यांच्यावर १८ कोटींच्या सौदेबाजीचे आरोप केला होता.
जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे सेनेचे ९ सदस्य निवडून आले, तर भाजपाचे २३ आणि शिंदे सेनेचे २१ सदस्य विजयी झाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिंदे सेनेने एकमेकांना शह देण्यासाठी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येऊन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत होते,
मात्र ऐनवेळी भाजपने बाजी उलटवली. त्यामुळे ठाकरे सेनेने ऐनवेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आधी आपल्याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर पैसे घेऊन भाजपच्या गळाला लागल्याचा आरोप केला. त्यावर संजय निकम यांनी दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदेसेनेसोबत सौदा केला, असा गंभीर आरोप केला. यानंतर दानवे आणि त्या दोन सदस्यांमध्ये समेट घडून आला.
आज गुरुवारी जिल्हा परिषद सभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधीही शिंदे सेना आणि ठाकरे सेनेने एकत्र येत सभापती पद मिळविण्याची तयारी केली होती, परंतु ऐनवेळी पुन्हा पक्षाच्या सदस्यांना तटस्थ राहण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी दानवे यांच्यावर सौदेबाजीचे आरोप केले. दानवे यांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून आर्थिक व्यवहार करत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, असा दावा डोणगावकर यांनी केला आहे. दानवे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती, असेही डोणगावकर यांनी म्हटले आहे.
दानवेंनी फेटाळले आरोप
अंबादास दानवे यांनी मात्र डोणगावकर यांचे आरोप फेटाळून लावले. माझी आणि एकनाथ शिंदे यांची कुठलीही बैठक झाली नाही. आमचे नऊ सदस्य होते. त्यामुळे आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष होण्याचा प्रश्न नव्हता. आता सभापती पदासाठीही तीच परिस्थिती होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला गेला. मी केवळ त्या आदेशाचे पालन केले. पैशाचे आरोप होत असतात, तुम्ही त्यांनाच विचारा, असे दानवे म्हणाले.