Alert issued to residents along the banks of the Godavari River
पैठण, पुढारी वृत्तसेवा :
हवामान विभागाने पुढील पाच दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह सोसायट्याचे वादळ, गारपिटीचा इशारा दिला आहे. सोमवारी (दि.३०) पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी गोदावरी नदी काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना संबंधित शासकीय विभागाला दिल्या.
पैठण तालुक्यात सोमवारी सकाळपासून सर्व महसूल मंडळात उन्हाची तीव्रता जास्त होती. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाली. सायंकाळी सहा वाजेदरम्यान तालुक्यातील विहामांडवा, बिडकीन, लोहगाव, पाचोड, दावरवाडी, ढोरकीन, नवगाव, जायकवाडी, पिंपळवाडी, आडुळ, बालानगर, आपेगाव, वडवळी, तुळजापूर, हिरडपुरी, पाटेगाव परिसरात पाऊस जाला. यामुळे शेतासह वीटभट्टीवर एकच तारांबळ उडाली. सध्या शेतकऱ्यांनी शेतातील गहू काढण्याचे काम सुरू केल्यामुळे काढून ठेवलेला गहू भिजून मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळते.
कर्मचाऱ्यांना खबरदारीची सूचना
हवामान विभागाने पुढील पाच दिवसासाठी अतिवृष्टीसह गारपीट होणार असल्याचा अंदाज जाहीर आहे. पैठण येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी जायकवाडी धरण प्रकल्पावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे.