

Vaijapur Water Released into Bor River Without Prior Notice; Elderly Farmer Swept Away
वैजापूर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी प्रकल्पातून 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोणतीही पूर्वसूचना न देता बोर नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे करंजगाव येथील एक शेतकऱी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, करंजगाव शिवारातल शेतकरी भानुदास मगर व राहुल मगर हे बैलगाडीने बोर नदी ओलांडत होते. यावेळी अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. त्यामुळे भानुदास गंगाधर मगर (वय 85) राहणार करंजगाव हे पाण्यात वाहून गेले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. या दुर्घटनेत त्यांच्या गायीचा देखील मृत्यू झाला आहे.
दरम्यान, त्याच वेळी परिसरातील इंग्रजी शाळेतील बसेस येत होत्या. चालकांनी सतर्कता दाखवत दोन्ही बाजूंना तत्काळ बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून कोणतीही पूर्वसूचना न देता नदीत पाणी सोडल्यामुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चौकशी करण्यात येऊन हलगर्जी करणाऱ्या पाटबंधारे विभागातील कारणीभूत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.