After the District Collector's assurance, the hunger strike is called off
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा रांजणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून कमळापूरच्या महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळाला शनिवारी (दि.२८) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली. तसेच या संदर्भात बुधवारी बैठक घेऊन येथील रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
रांजणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते कमळापूर येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेष करून पावसाळ्यात रस्त्यावर मोठी दलदल निर्माण होऊन शाळकरी मुले, महिला तसेच कामगारांना या रस्त्यावरून ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ओमसाईनगर, बापूनगर, श्रीरामनगर, साई समृद्धी, महात्मा फुले नगर, स्वामी समर्थनगर, शिवशंकर कॉलनी, न्यू श्रीरामनगर, विठ्ठल वाटिका तसेच हनुमाननगराला जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने दिवस-रात्र या रस्त्यावर ये जा करणाऱ्यांची वर्दळ असते. ६० फूट रुंदीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सदरील अतिक्रमण काढून रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरणाचे काम करण्यात यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.
मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने बुधवारपासून डॉ. शाम शेळके यांनी आमरण तर शिवाजी गायकवाड, प्रवीण साबळे, ज्ञानेश्वर जमदाडे, राजेंद्र कडू, गणेश सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. शनिवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन रस्त्याच्या कामाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी बुधवारी (दि.२) एमआयडीसी तसेच जिल्हा परिषदचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांची बैठक घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर डॉ. शाम शेळके आदींनी उपोषण मागे घेतले.
यावेळी तहसीलदार नवनाथ वघवाड, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, उपअभियंता सातपुते, अनंत ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, दत्तू हिवाळे, प्रभाकर महालकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, मंडळ अधिकारी सचिन भिंगारे, तलाठी चंद्रभान माळी आदींची उपस्थिती होती.