Aditya Thackeray : GDP is growing; So why is there no development?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात आता कोणतीही मोठी निवडणूक लगेच नाही. त्यामुळे राजकारणाकडे न पाहता सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकार सतत जीडीपी वाढतोय म्हणते, मग विकास का दिसत नाही, असा सवाल उपस्थित करीत दुष्काळ मराठवाड्याच्या उंबरठ्यावर असतांना सरकार जीडीपीतच रमल्याचा टोलाही शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी एमजीएम विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी ठाकरे म्हणाले की, मराठवाड्यातील २११ कंपन्या बंद पडल्या किंवा बाहेर गेल्या आहेत, मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी चिता व्यक्त केली. अभिजीत दीपके शाळांमध्ये जाऊन पाहणी करीत असून काही ठिकाणी बनावट विद्यार्थी बसविल्याचे आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या विषयांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. देशात अनेक समस्या असतांना सरकार जीडीपीवर भाष्य करीत आहे. ते म्हणाले, देशाचा जीडीपी ७.८ टक्के असल्याचे सांगितले जाते; मात्र त्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसायला हवा. सरकारने याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी.
२०४७पर्यंत देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार की अर्थव्यवस्था वृद्ध बनणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण आजच्या कार्यक्रमात राजकीय टीका केली नाही आणि करणारही नाही. राजकारणापलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.