A farmer ended his life due to not receiving a fair price for his onions
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील एका अल्पभूधारक शेतक-याने कांद्याला मिळालेल्या कवडीमोल भावामुळे सोसायटी व इतर कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रभान कचरू गाडे (वय ५६, रा. दत्तमंदिर रोड, लखमापूर) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
चंद्रभान गाडे हे शुक्रवारी (दि.१५) रात्री ८ वाजल्यापासून घरातून बाहेर गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. शनिवारी (दि.१६) सकाळी गावाजवळील पाझर तलाव परिसरात काही महिला गेल्या असता गाडे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले.
त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगा तसेच दोन विवाहित मुली असा परिवार आहे. दरम्यान लखमापूर शिवारात त्यांची एक एकर शेती असून त्यांनी यावर्षी कांद्याची लागवड केली होती. उत्पादन चांगले झाले असतानाही बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची चिंता त्यांना सतावत होती.
विविध सेवा संस्थेचे २६ हजार रुपये कर्ज तसेच इतर उसनवारीचा ताणही होता. कांदा पिकासाठी झालेला खर्च, आर्थिक अडचणी, बाजारभावातील घसरण, पती-पत्नीचे आजारपण या सर्व कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.