

बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, बाजारात कांद्याला मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आहेत. एकीकडे दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे कांदा मात्र 6 रुपये किलो या दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.
वडापाव 20 रुपये, पाण्याची बाटली 20 रुपये, आईस्क्रीम 20 रुपये, चॉकलेट 10 रुपये इतके दर असताना, शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकलेल्या कांद्याला मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कांदा लागवडीसाठी एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च होत असून बियाणे, खते, औषधे, फवारणी व मजुरी यामुळे उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे.
मजूरटंचाईमुळे महिलांना 300 रुपये तर पुरुष मजुरांना 500 रुपये मजुरी द्यावी लागत आहे.इतका खर्च करूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काही ठिकाणी संतापाच्या भरात कांदा पिकावर रोटावेटर फिरवण्यात आला, तर काही शेतकऱ्यांनी उभे पीक जाळून टाकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे फक्त कांदा नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही राखरांगोळी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक संकट वाढत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या अडचणीही निर्माण झाल्या आहेत.