830 candidates are in the fray for Zilla Parishad and Panchayat Samiti elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या ६३ गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या १२६ गणांसाठी १५०२ उमेदवारांनी निवडणूक रिं-गणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता गट-गणांसाठी उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असून, आजपासून जिल्ह्यात या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यंदा प्रचारासाठी केवळ ७ दिवसांचाच कालावधी दिला आहे.
जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा मंगळवारी (दि. २७) शेवटचा दिवस होता. यंदा ९ वर्षांनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
त्यामुळे उमेदवारांची संख्या २३३२ एवढी होती. परंतु यात १५०२ जणांनी माघार घेतली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यात माघारीनंतर कन्नड तालुक्यात सर्वाधिक १५३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात गटासाठी ५२, तर गणासाठी १०१ उमेदवारांचा समावेश आहे.
सिल्लोडमध्ये गटासाठी ३८, तर गणासाठी ६४ जणांनी माघार घेतल्याने आता गटासाठ ३९ तर गणासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. सोयगावमध्ये २० जणांनी माघार घेतल्याने गटासाठी ११ आणि गणासाठी २६ उमेदवार आहेत. फुलंब्रीमध्ये ९९ जणांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात गटासाठी १४ आणि गणासाठी ३० उमेदवार आहेत.
पैठणमध्ये १२७ जणांच्या माघारीनंतर गटासाठी ३५ गणासाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १९७ जणांच्या माघारीनंतर गटासाठी ४८ गणासाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. वैजापूरमध्ये गटासाठी ३६ गणासाठी ६४ उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूरमध्ये १२० जणांच्या माघारीनंतर गटासाठी ३६ गणासाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. खुलताबादमध्ये ४२ जणांच्या माघारीनंतर गटासाठी ११ गणासाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.
साम-दाम-दंड-भेद
मंगळवारी उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या बंडखोरांना थंड करण्यावर भर दिला होता. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदचे डावपेचाचा अवलंब करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. पक्षाच्या नेत्यांनी भविष्यात नव्या जबाबदारींचे आश्वासनही दिले. तर काही ठिकाणी प्रतिस्पध्र्थ्यांचे मतविभाजन करण्यासाठी जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवार देण्यात आले.