8 hours of heavy rain bring relief to Fardapur
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर परिसरात बुधवारी (दि. ८) पहाटेपासून तब्बल आठ तास मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला. दमदार पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातील वाघूर नदीला हंगामातील पहिला पूर आला असून प्रसिद्ध सप्तकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित झाला आहे.
दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्यामुळे वाघूर नदी, सिंचन तलाव, पाझर तलाव आणि विहिरींची पाणीपातळी घटली होती. पिकांसाठी आवश्यक ओलावा नसल्याने पेरणी केलेली पिके धोक्यात आली होती, तर अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी झालेल्या सलग पावसामुळे शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पहाटे सुमारे चार वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी अधिक तीव्र झाला आणि सहा ते सात तास संततधार सुरूच राहिली. त्यामुळे वाघूर नदीला हंगामातील पहिला पूर आला. यामुळे जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणीतील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा पुन्हा जोमाने कोसळू लागला. लेणी परिसरातील इतर लहान-मोठे धबधबेही प्रवाहित झाल्याने संपूर्ण परिसराचे निसर्गसौंदर्य खुलून आले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे फर्दापूर येथील अजिंठा घाटात एका ठिकाणी दरड कोसळून दगड राष्ट्रीय महामार्गावर आले. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पावसामुळे छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर बसस्थानकाजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक काही काळ संथ झाली. वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागली, तर काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडीही झाली.
गावातील सराई भाग, जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील परिसर तसेच नेहरू मेमोरियल उर्दू स्कूल परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. पादचारी, | दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावरच साचून राहिले.
दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पहिल्याच जोरदार पावसात पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह गावातील सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.