465 farmers ended their lives in Marathwada in six months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत विभागात ४६५ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १०९ जणांनी आत्महत्या केली असून, एकट्या जून महिन्यात विभागात तब्बल २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात आतापर्यंत २१५ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत अदा झाली आहे. तर २६ प्रकरणे अपात्र ठरली असून, २२२ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणा आणि इतर कारणांना कंटाळून बळीराजा स्वतःची जीवनयात्रा संपवत आहे. गेल्या वर्षभरात विभागात तब्बल ११३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या धक्कादायक आकड्यानंतरही आत्महत्याचे हे सत्र थांबलेले नाही. या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ४६५ शेतकऱ्यांनी जीव दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. तसेच नवे कर्ज वितरणही सुरू केले आहे. मात्र असे असतानाही आत्महत्या सरूच आहेत.
राज्यातील दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मागील सहा वर्षांपासून विभागातील पर्जन्यमानाचे प्रमाण वाढले आहेत. १० वर्षांपूर्वी हे प्रमाण कमी होते. मात्र आता दमदार पाऊस होत आहे. शिवाय कर्जमाफीचाही निर्णय घेतला आहे.
असे असतानाही विभागातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नाही. त्यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाला शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर-१०९
जालना-४० आत्महत्या
बीड-९५ आत्महत्या
नांदेड-६१ आत्महत्या
परभणी-३४ आत्महत्या
धाराशिव-६५ आत्महत्या
लातूर-२६ आत्महत्या
हिंगोली-३५ आत्महत्या