22 goats ran away, frightened by the sound of a DJ.
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या गडबडीत हरवलेल्या तब्बल २२ बकऱ्या जामगाव येथील नागरिकांनी दिवसभर सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन केल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे. या घटनेतून जामगावकरांचा प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
कायगाव येथील सीताराम जीवाजी नजन यांच्या शेडमध्ये ठेवलेल्या २२ बकऱ्या २८ एप्रिलच्या रात्री शेजारी सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमातील डीजेच्या मोठ्या आवाजामुळे घाबरून पळून गेल्या. रात्री उशिरापर्यंत नजन यांनी कायगाव व भेंडाळा परिसरात शोध घेतला; मात्र वकऱ्या सापडल्या नव्हत्या.
दरम्यान, २९ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेलेल्या जामगाव येथील काही नागरिकांना बोजवारे वस्तीजवळ या बकऱ्या भटकताना दिसल्या. त्यांच्या मागे कोणीही नसल्याचे लक्षात येताच सुनील ठाकूर, सुनील बोराटे, डॉ. गोरख तुपलोंढे, सुभाष माने, संजय तागड, किरण दांडगे, संजय तुपलोंढे, सचिन काळे, लखन शेळके, दत्तात्रय रोडगे, अशोक तागड व धनू काळे यांनी पुढाकार घेत सर्व बकऱ्या हाकलत जामगाव येथे आणल्या होत्या. मुळ मालकापर्यंत या बकऱ्या पोहचल्या पाहिजे या भावेनेतून ग्रामस्थांनी प्रामाणिक प्रयत्न केले.
असा लागला मालकाचा शोध
किरण दांडगे यांच्या शेडमध्ये दिवसभर बकऱ्यांना सुरक्षित ठेवून मालकाचा शोध घेण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली. चौकशीअंती या बकऱ्या कायगाव येथील सीताराम नजन यांच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने संपर्क करून बोलावण्यात आले व ओळख पटवून अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांच्या बकऱ्या सुरक्षित परत करण्यात आल्या. आपल्या उपजीविकेचा आधार असलेल्या बकऱ्या परत मिळाल्याने सीताराम नजन भावुक झाले. जामगाव ग्रामस्थांचे त्यांनी मनापासून आभार मानले. प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेल्या या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.