छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या 'स्माईल' योजनेंतर्गत शहरातील सुमारे २०० भिक्षेकरूंचे महानगरपालिकेमार्फत पुनर्वसन करण्यात येणार आहे. या विशेष उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला ४८ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
शहरात भिक्षा मागणाऱ्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाने देशातील काही निवडक शहरांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आली असून, या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेने 'उम्मीद' संस्थेकडे सोपविली आहे.
सध्या 'उम्मीद' संस्थेमार्फत शहरभर व्यापक सर्वेक्षण मोहीम सुरू असून, भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती गोळा केली जात आहे. या माहितीच्या आधारे प्रत्येक लाभार्थ्यासाठी स्वतंत्र पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.
या प्रक्रियेत लाभार्थ्यांच्या क्षमता व आवडीनुसार लघुउद्योग, स्वयंरोजगार, हस्तकला आणि सेवा क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच नियमित समुपदेशन करून त्यांना रोजगारक्षम व स्वावलंबी बनवले जाईल, जेणेकरून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल.
भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली जाईल. संबंधित संस्थेमार्फत त्यांची देखभाल, समुपदेशन आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून ४८ लाख ७० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.कल्पिता पिंपळे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका