114 Wtankers still operating in Marathwada despite the monsoon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल १८ दिवसांचा खंड राहिला. त्यामुळे भर पावसाळ्यातही विभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्याने टँकर संख्या ९६ वर आली होती. पंरतु, आठ दिवसांतच ती ११४ वर पोहचली असून अधिग्रहण केलेल्या विहिरींची संख्याही ४४३ वर गेली आहे.
मराठवाड्याला यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. जूनमध्ये वेळेत पावसाला सुरुवात झाली नाही. त्यानंतर जुलैमध्ये दमदार हजेरी लागेल, अशी शक्यता होती. पंरतु, काही जिल्ह्यांतच पावसाचा जोर चांगला राहिला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यात टैंकर संख्या ४०० हून अधिक होती. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. २ ऑगस्टपर्यंत पाऊस सुरूच राहिला.
त्यामुळे विभागातील टँकरची संख्या देखील शंभरीच्या आत आली होती. परंतु, ३ ते १९ ऑगस्टदरम्यान विभागात भूरभूर वगळता दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे विभागात पुन्हा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून ११४ टँकरद्वारे चार जिल्ह्यांतील गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
मोठे प्रकल्प ४९ टक्क्यांवर
मराठवाड्यात जायकवाडी, विष्णुपुरी वगळता ११ पैकी ९ प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यात सहा प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्क्यांच्या आतच जलसाठा उपलब्ध आहे. तर ३ प्रकल्प ६० ते ७० टक्क्यांमध्ये आहे.