Walmik Karad Bail Plea Supreme Court Update
नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला असून या 'सर्वोच्च’ दणक्यामुळे वाल्मीक कराडचा तुरुंगातील आणखी वर्षभरासाठी लांबणार आहे.
डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड हा घटनेच्या तीन आठवड्यांनी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात पोलिसांना शरण आला होता. तेव्हापासून वाल्मीक कराड तुरुंगात आहे.
सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
गुरुवारी सुप्रीम कोर्टाने वाल्मीक कराडला मोठा दणका दिला. 'वाल्मीक कराडला एक वर्ष जामीन मागता येणार नाही', असे निर्देशचे सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. गुरुवारी सुप्रीम कोर्टात वाल्मीक कराडच्या वतीने शिरीष गुप्ते यांनी बाजू मांडली. 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आम्हाला लागूच होत नाही. मकोकाबाबत प्राथमिक अर्जात नाव नसल्याने या कायद्यान्वये आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही', असे कराडच्या वकीलांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने यानंतर कराडची बाजू ऐकून घेतली नाही. यानंतर सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडला जामीन देण्यास विरोध केला. 'कराडचा हा पहिला गुन्हा नाही. कराडवर 20 गुन्हे दाखल आहेत. हा 21 वा गुन्हा आहे. त्यामुळे जामीन देता येणार नाही', असे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच पुढील सुनावणी ट्रायल कोर्ट करेल, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास दिला होता नकार
वाल्मीक कराडने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. तपासात त्रुटी असून 'मकोका'चे कलम लावणेही चुकीचे आहे, असा दावा वाल्मीक कराडची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हायकोर्टात केला होता. डिसेंबर 2025 मध्ये हायकोर्टाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मुंबई हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानेही वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता वर्षभर वाल्मीक कराड हा तुरुंगातच राहणार, असा अंदाज आहे.