Beed soybean crop loss pudhari photo
बीड

Beed soybean crop loss : पावसाच्या मोठ्या ब्रेकने सोयाबीन झाले जळून खाक..!

आभाळाकडे डोळे लावलेल्या शेतकऱ्यांची निराशाच; वडवणी तालुक्यातील परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : हिरव्यागार सोयाबीनच्या शेतात यंदा भरघोस उत्पादनाची स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर आता करपलेले पीक उभे आहे. सुरुवातीच्या पावसाने साथ दिल्याने चांगली उगवण झालेल्या सोयाबीनला ऐन वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने पाठ फिरवली. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने वडवणी तालुक्यातील अनेक भागांत सोयाबीनचे पीक अक्षरशः करपून गेले आहे. काही ठिकाणी पाने वाळून गेली, फुलोरा गळून पडला, तर अनेक शेतांमध्ये उभे पीक जळाल्यासारखे दिसत आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. वेळेवर पाऊस झाल्याने सोयाबीनची पेरणी झाली. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पीक उभे केले. सुरुवातीला पिकाची उगवणही चांगली झाली.

शेतात पसरलेली हिरवाई पाहून यंदा उत्पादन चांगले मिळेल, कर्जाचा काही हिस्सा फेडता येईल, घरखर्च भागेल आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हाताशी राहतील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती.मात्र, निसर्गाने ऐन वेळी दगा दिला. पिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असताना पावसाने मोठी दडी मारली. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत गेला आणि सोयाबीनची वाढ खुंटली. फुलोऱ्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी हिरवाईने नटलेली शेते आता पिवळी पडलेली आणि करपलेली दिसत आहेत. शेतात उभे पीक हातात घेऊन त्याची अवस्था पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. पेरणीपासून आजपर्यंत केलेली मेहनत, त्यासाठी केलेला खर्च आणि घेतलेले कर्ज आठवून काळीज पिळवटून निघत आहे.शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे.

काहींनी व्यापारी, सावकार किंवा परिचितांकडून उधारी करून बियाणे, खते व औषधे खरेदी केली. मशागत आणि मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. एवढा खर्च करून उभे केलेले पीकच जर हातातून गेले तर कर्ज फेडायचे कसे, घरखर्च भागवायचा कसा आणि पुढील हंगामाची तयारी करायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

पाऊस आणखी काही दिवस लांबला तर उरलेसुरले पीकही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. उत्पादन होण्याआधीच खर्चाचा डोंगर उभा राहिला असून उत्पन्न मात्र शून्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आर्थिक संकट घेऊन येण्याची चिन्हे आहेत.

आज शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर करपलेले सोयाबीन आहे, मनात कर्जाचा डोंगर आहे आणि ओठांवर एकच प्रश्न आहे—“आता पुढे काय?” वर्षभराच्या कष्टानंतर हातात चार पैसे येतील, या आशेवर उभे असलेले पीकच जर निसर्गाने हिरावून घेतले, तर शेतकऱ्याने जगायचे कसे? पावसाची आस अजूनही कायम आहे; मात्र आता प्रत्येक दिवस पिकासाठी आणि शेतकऱ्याच्या आशेसाठी निर्णायक ठरत आहे. करपलेल्या सोयाबीन सोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपण्यापूर्वी शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून वस्तुस्थिती जाणून घ्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

कागदोपत्री नव्हे, बांधावर जाऊन पंचनामे करा

पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची महसूल आणि कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी. करपलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई तसेच पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT