Two cows and a buffalo die in Manjara river flood
बीड, पुढारी वृत्तसेवा: पाच पंचवीस लिटर दूध होतं रोजचं... ते बंद पडलंय... उद्या सण आला तर काय करावं..? पारगाव, दासखेडाकडून मालक गेले, पण नदीला पाणी असल्यानं कुठूनच जाता आलं नाही, रातभर बांधावर बसले, गुरं सोडता आले नाहीत... गुरं ओरडत होते, पण पाण्यामुळे काहीच करता येत नव्हते... तुम्ही आला म्हणून नाही पण चार रोज झालं डोळ्याचं पाणी तुटनाय... ही व्यथा आहे अनपटवाडीतील विमल जायभाये यांची... त्यांच्या दोन गायी, एक म्हैस मांजरा नदी आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडली.
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरा नदी वरदान ठरलेली आहे, या डोंगराळ तालुक्यात जी काही बागायती शेती बघायला मिळते ती या नदीच्या काठावरच... बीड जिल्ह्याच्या सिमेवर असलेले अनपटवाडी हे गाव याच नदीच्या काठावर वसलेले... गाव पाटोदा खर्डा रोडवर तर शेती मांजरा नदीच्या पलीकडच्या काठावर... दरवर्षी पावसाळ्यात शेतीतील कामे करतांना मांजरा नदी पार करुनच जावे लागते... अनेक वर्ष मागणी करुनही हा पुल झालेला नाही... याचा मोठा फ टका या शेतकऱ्यांना यावर्षी बसला.. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे रात्री दोन वाजता नदीचे पाणी वाढू लागले...
आकाशात विजांचा गडगडाट, धो-धो को-सळणारा पाऊस पाहून अनपटवाडीकरांच्या काळजात धस्स झालं... नदीचं पाणी रस्त्यापर्यंत येत असलेलं पाहून नदीच्या पलीकडील काठावर असलेल्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांचं काय? असा प्रश्न या पशुपालक शेतकऱ्यांना पडला... पण पलीकडे जायचं तरी कसं? नदीवर कोणताही पुल नसल्यानं आणि पुराचे पाणी वेगात वाहत असल्याने या शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला... जवळच असलेल्या दासखेड, पारगाव येथून प्रयत्न केला परंतु तेथेही पुलावर पाणी, पाटोद्याकडून पलीकडच्या काठावर गेले पण तोपर्यंत शेतात डोक्यापेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह होता... गुरं ओरडत होती, पण त्यांच्यापर्यंत पोहचता येत नव्हतं.... पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जनावरं डोळ्यादेखत वाहून जात होती, जागेवरच मृत्यमुखी पडत होती... पण त्यांना वाचता येत नसल्यानं शेतकऱ्यांचं काळीज पिळवटून निघत होतं...
याच दुभत्या जनावरावर उदरनिर्वाह चालत होता... विमल जायभाय या महिला शेतकऱ्याने त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला... पाच पंचवीस लिटर दूध होतं रोजचं... ते बंद पडलंय... उद्या सण आला तर काय करावं..? पारगाव, दासखेडाकडून मालक गेले, पण नदीला पाणी असल्यानं कुठूनच जाता आलं नाही, रातभर बांधावर बसले, गुरं सोडता आले नाहीत... गुरं ओरडत होते, पण पाण्यामुळे काहीच करता येत नव्हते... तुम्ही आला म्हणून नाही पण चार रोज झालं डोळ्याचं पाणी तुटनाय... ही व्यथा सांगतांना विमल जायभाये यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली... त्यांच्याप्रमाणेच गावातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली... त्यांना आता सरकार जी मदत देईल ती अगदीच तुटपूंजी ठरणार हे उघड असले तरी ती मिळणार कधी? तोपर्यंत या शेतकऱ्यांनी करायचं काय.
दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे जर्सी गायी, म्हशी होत्या. या जनावरांची किंमतही लाखात, त्यांच्या दुग्ध उत्पादनातून कुटूंबाचा खर्च भागतो. पण आता ही जनावरंच वाहून गेली, सरकारच्या मदतीतून एक जनावरंही खरेदी करता येणार नाही, यामुळे या शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे.
याच गावातील गणेश जायभाये या शेतकऱ्याच्या शेतात भाजीपाला पिके होती. गवार, कांदा, शेपुचुका, भेंडी यासह इतर भाजीपाल्यातून पाटोद्याच्या गुरुवारच्या बाजारात पाच ते सहा हजार रुपये मिळायचे. पण या भाजीपाल्याच्या शेतातून पाणी वाहिल्याने होत्याचं नव्हतं झालं... आता मिळणारं उत्पन्न तर बंद झालंच त्याबरोबर शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचे गणेश जायभाये यांनी सांगितले.
अनपटवाडी शेजारीच असलेल्या घुमरा पारगाव शिवारात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कितीही पाणी आले तरी ऊसाला धोकाच नाही, असे सांगितले जाते. पण अतिवृष्टीबरोबरच जोराचा वारा सुटल्याने ऊसाचे पिक आडवे झाल्याचे बाळासाहेब घुमरे यांनी सांगितले. त्यांच्याप्रमाणेच गावातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस, कापुस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकारनं ठोस मदत करावी, अशी मागणी बाळासाहेब घुमरे यांनी केली आहे.