The Purushottam Temple is being constructed in a traditional architectural style.
टाकरवण, पुढारी वृत्तसेवा :
माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तमाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार सध्या पारंपरिक वास्तुशिल्प शैलीत वेगाने सुरू असून, या भव्य मंदिराचे रूप आता आकाराला येऊ लागले आहे. राज्यातील ९ प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनाचा निर्णय चार वर्षांपूर्वी तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. त्यामध्ये पुरुषोत्तमपुरी येथील या मंदिराचा समावेश असून, या कामासाठी अर्थसंकल्पात तब्बल ५४ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
सुमारे १५०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचा उल्लेख शिलालेखांत आढळतो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर संपूर्ण भारतातील भगवान पुरुष-ोत्तमाचे एकमेव मंदिर मानले जाते. अधिकमास, म्हणजेच 'धोंड्याचा महिना', या काळात येथे भरणारी यात्रा विशेष महत्त्वाची असून महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
मंदिराच्या बांधकामात पूर्णतः पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सिमेंटऐवजी चुना, गूळ, बेलफळाचा रस, दगडांची भुकटी आणि चुनखडी यांचे मिश्रण वापरून बांधकाम केले जात आहे. मंदिराचे खांब, भिंती, कमानी, झर ोके आणि घुमटावरील नक्षीकाम यामध्ये प्राचीन स्थापत्यकलेचा देखणा आविष्कार दिसू लागला आहे.
राजस्थान व नांदेड येथून विशेष दगड मागवून संपूर्ण मंदिर दगडी स्वरूपात उभारले जात आहे. मंदिरालगत सहलक्षेश्वर महादेव मंदिराचे कामही सुरू आहे.या मंदिराची रचना केवळ धार्मिक स्थळ म्हणून मर्यादित नसून ध्यान-धारणा, भजन-कीर्तन, उपासना तसेच सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने करण्यात येत आहे. गावकरी आणि मंदिर समिती यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.
अधिकमास यात्रेची तयारी
यंदा १७ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत अधिकमास येत असल्याने येथे मोठी यात्रा भरणार आहे. सध्या मंदिराचे काम सुरू असल्याने भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती तात्पुरत्या शेडमध्ये ठेवण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. या पारंपरिक दगडी बांधकामामुळे मंदिरात नैसर्गिक गारवा टिकून राहतो. उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदारपणा देणारी ही रचना भाविकांना वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. दगड, चुना आणि नैसर्गिक घटकांवर आधारित ही बांधणी निसर्गाशी सुसंगत आहे. त्यामुळे मंदिरातील वातावरण अधिक शांत व प्रसन्न राहील असे आर्किटेक्ट किरण कलमदानी सांनी सांगितले.