The intensity of the heat has risen; water projects have dried up by the very beginning of April
बीड, पुढारी वृत्तसेवा: एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने बीड जिल्ह्यातील पाणी परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. वाढत्या तापमानाचा फटका थेट जलसाठ्यांना बसत असून अनेक लघु प्रकल्प व पाझर तलाव कोरडे पडल्याचे वास्तव समोर येत आहे.
परळी तालुक्यातील कातकरवाडी येथील लघु प्रकल्प तसेच डाबी येथील पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर खोडवा सावरगाव येथील पाझर तलावानेही तळ गाठल्याचे दिसून येत आहे. या जलस्रोतांवर शेतीसह जनावरांच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भागवली जात होती. मात्र सध्या हे स्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
पावसाळा येईपर्यंत पर्यायी व्यवस्था न केल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच चाऱ्याची टंचाई भासत असताना पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षी चांगल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील तब्बल १७३ पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते.
मात्र यावर्षी वाढती उष्णता आणि अवैध पाणी उपशामुळे या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्यानेघट होत आहे. अनेक ठिकाणी पाणीपातळी धोकादायकरीत्या खाली गेल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील अवैध पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत वेगाने आटत असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. अवैध पाणी उपसा रोखून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.
तसेच तालुकास्तरावर याबाबत कठोर उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली ही परिस्थिती अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.