Dharur Fort : धारूर किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजळणार file photo
बीड

Dharur Fort : धारूर किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजळणार

८.९८ कोटींच्या संवर्धन कामाला प्रत्यक्ष सुरुवात; दोन वर्षांत होणार सर्वकष जतन-दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

The historical glory of Dharur Fort is set to be revived

धारूर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या राज्य संरक्षित धारूर किल्ल्याच्या सर्वंकष जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. तब्बल ८ कोटी ९८ लाख ८७ हजार ७६० रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजळणार असून धारूरला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कामाची निविदा भोपळा येथील बीएनएस कंपनीला मिळाली असून किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. पारंपरिक चुना मशनरी पद्धतीने संवर्धन करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक साहित्य किल्ला परिसरात दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणावर मजूरही कार्यरत असून संपूर्ण प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. धारूर किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवत त्याचे जतन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर किल्ल्याचा महावारसा विशेष स्मारक योजनेच्या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला. अंबाजोगाई येथील मे. परिचय आर्किटेक या वास्तुविशारद संस्थेने तयार केलेल्या संवर्धन आराखड्याला पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

या प्रकल्पांतर्गत किल्ला परिसरातील झाडे-झुडपे हटविणे, कोसळलेली तटबंदी पूर्ववत उभारणे, मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती, तटबंदीतील भेगा ग्रीटिंगद्वारे भरणे, तुटलेले दगडी कंगोरे पूर्ववत करणे, दगडी फरशी बसविणे, माहितीफलक उभारणे तसेच इतर संवर्धनाची कामे केली जाणार आहेत. संपूर्ण काम पुरातत्त्व विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याने किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित राहणार आहे. धारूर किल्ला हा मराठवाड्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा असून दरवर्षी हजारो पर्यटक, इतिहासप्रेमी आणि अभ्यासक येथे भेट देतात. मात्र, दीर्घकाळ दुरुस्तीअभावी तटबंदी व इतर वास्तूंची झीज होत होती. आता सुरू झालेल्या या सर्वंकष संवर्धनामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिक उजळून निघणार आहे.

पर्यटनाला नवसंजीवनी

धारूर किल्ल्याच्या संवर्धनामुळे केवळ ऐतिहासिक वारसा जपला जाणार नाही, तर स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. किल्ल्यावर मूलभूत सुविधा, माहितीफलक आणि सुरक्षित तटबंदी उपलब्ध झाल्यानंतर इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार, पर्यटन व्यवसाय आणि धारूर शहराच्या आर्थिक विकासालाही या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT