The Dhārūr-Mumbai sleeper bus, which operates from the Dhārūr depot, is in poor condition.
गौतम बचुटे
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर आगारातून धावणारी धारूर-मुंबई शयनयान बस प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास देण्याऐवजी अक्षरशः मनस्तापाचे कारण ठरत आहे. 'शयनयान' असे गोंडस नाव असलेली ही बस प्रत्यक्षात नरकयातनाच देत असल्याची तीव्र भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे. २१व्या शतकातही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची, विशेषतः धारूर आगाराची ही दयनीय अवस्था धक्कादायक आहे.
केज आणि धारूर तालुक्यांतील प्रवाशांची मदार असलेल्या या सेवेत धूर काढणाऱ्या, रस्त्यात हमखास बंद पडणाऱ्या व वेळेवर न धावणाऱ्या बसमुळे प्रवाशांचा संयम सुटत आहे. ओबडधोबड रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या काळातील साध्या सर्व्हिस बस तरी बऱ्या होत्या, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत. परिणामी प्रवाशांचा ओढा खाजगी वाहतुकीकडे वळत असून, त्या तुलनेत भाडे कमी व सुविधा अधिक असल्याचे वास्तव समोर येत आहे.
साध्या 'लालपरी'च्या तुलनेत शयनयानचे तिकीट दर सुमारे दीडपट अधिक आहेत. मात्र जास्त पैसे देऊनही प्रवाशांना पाचपट गैरसोय सहन करावी लागत आहे. खिडक्यांच्या काचा बंद होत नाहीत; काही खिडक्यांना काचच नसून प्लास्टिक लावून थातुरमातुर उपाय. लॉक नाहीत, पडदे धुळीने माखलेले व कळकट. मोबाईल चार्जर पोर्ट बंद, रीडिंग लाईट बंद, सोयींची शयनयान यादी शून्याच्या जवळ. रात्रीचा प्रवास करून उतरल्यावर 'उकिरड्यातून आलो' अशी किळसवाणी भावना येते, अशी थेट प्रतिक्रिया प्रवाशांकडून मिळत आहे.
भंगार बसमुळे प्रवाशांचा राग चालक-वाहकांबर उतरतो. मात्र खरी जबाबदारी आगार प्रमुख, तांत्रिक विभाग आणि परिवहन खात्याची असल्याचा आरोप प्रवासी करतात असे आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी सांगितले. भंगार बस हटवा, दर्जेदार सेवा द्या; अन्यथा 'मनस्तापयान'चा प्रवास थांबवाच, अशीच प्रवाशांची आक्रमक मागणी आहे. प्रवाशांच्या तक्रारी तांत्रिक विभागाला कळवून दुरुस्तीबाबत सूचना दिल्या जातील.
ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे बस खिळखिळी झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाढदिवसानिमित्त नातवाला टेस्ला कार भेट दिल्याची चर्चा असताना, राज्यातील सामान्य प्रवाशांना किमान शिव्या खाव्या लागू नयेत इतक्या तरी सुसज्ज बस देणार का, असा रोखठोक सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
तोटा' प्रवाशांच्या माथी मारण्याचा आरोप निराधार
खासगी बस सेवेकडे प्रवासी वळत असल्याने महामंडळाला होणारा तोटा 'प्रवाशांमुळे' असल्याचा आरोप केला जातो. मात्र खराब बस, निकृष्ट सुविधा आणि व्यवस्थापनातील उदासीनता हीच मूळ कारणे असताना तोटा प्रवाशांच्या माथी मारणे अन्यायकारक व तथ्यहीन असल्याचा ठाम आरोप प्रवासी करत आहेत.