माजलगाव : माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सासरी राहणाऱ्या ३३ वर्षीय विकास दत्तात्रय वाघमोडे यांच्या खूनप्रकरणाचा अवघ्या १२ तासांत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि माजलगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. जुन्या वैमनस्यातून आदित्य बारवाळ याने चाकूने वार करून विकासचा खून केल्याची कबुली चौकशीत दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास वाघमोडे यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सासू-सासऱ्यांच्या निधनानंतर ते गेल्या पाच वर्षांपासून तालखेड येथे सासरी राहून शेतीची जबाबदारी सांभाळत होते. रविवारी (२८ जून) रात्री शेताकडे गेल्यानंतर ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. सोमवारी सकाळी तालखेडजवळील खंडोबा वाडी परिसरात त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.
गळा, पोट आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार असल्याने खुनाचा संशय बळावला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान विकास वाघमोडे आणि आदित्य बारवाळ यांच्यात काही दिवसांपूर्वी गंभीर वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत आरोपीने सांगितले की, पुणे येथे झालेल्या मारहाणीचा तसेच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तालखेड फाट्यावर झालेल्या भांडणाचा राग मनात होता.
त्या वादात विकासने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्याने केला. या वैमनस्यातून २८ जूनच्या रात्री गावातून विकासचा पाठलाग करून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडविले आणि चाकूने पोट व गळ्यावर वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली.