हरूण कच्छी आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी गावाच्या वैभवात आणखी एक भर पडणार असून देहू येथील शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गाथा मंदिराची पूर्णाकृती असलेले वैराग्य मूर्ती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे गाथा व महाकालेश्वर मंदिर उभारण्यात येणार आहे.
या मंदिर उभारणीचा सोहळा ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे. पायाभरणी सात मे रोजी १०८ डॉ. सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या हस्ते तसेच श्री १०८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी जंगम मठ वाराणसी यांच्या सानिध्यात व साधुसंत, मठाधिपती आदींच्या उपस्थितीत होणार आहे. या धार्मिक कार्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवसंत लक्ष्मण महाराज मठाचे मठाधिपती श्री विश्व चैतन्य महाराज यांनी केले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आष्टी गावात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले स्थळे आहे. यात वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे संजीवन समाधीस्थळ असून सर्वच जाती धर्मासाठी कार्य आहे. जवळपास ५५०९ अभंग, लक्ष्मण गाथा, अभंग भारूड काव्याची रचना त्यांनी केलेली आहे. अशा या महान संताचे समाधिस्थळ आष्टी गावात आष्टी पाथरी महामार्गावर असून या ठिकाणी दिव्य सानिध्यात महाराजांनी ग्रंथ, काव्य, अभंगाची रचना केलेली आहे. मंगळवारी (दि. ५) रोजी श्रींच्या समाधिस रुद्र अभिषेक श्री गणेश याग, अथर्वशीर्ष पठण व अंगारकी चतुर्थी उद्यापन सोहळा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ६) रोजी सकाळी श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक, रुद्र स्वाहाकार व महामंगल आरती व महाप्रसाद तसेच गुरुवारी (दि. ७) रोजी सकाळी श्रींच्या समाधिस रुद्राभिषेक प. पु. ष. ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या हस्ते व श्री जगद्गुरू १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी जंगम मठ वाराणसी यांच्या दिव्य सान्निध्यात श्रीमद् जगद्गुरु महास्वामीजी, शिवाचार्य, गुरुवर्य, साधुसंत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, माहेश्वरगन, गायक वादक यांच्या पावन उपस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय मान्यवर आदींच्या उपस्थितीत गाथा मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे.
त्यानंतर भजन धर्मसभा व महाप्रसाद होणार आहे. या भव्य दिव्य मंदिरासाठी जवळपास १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जवळपास १५ ते २० कोटी रुपये खर्चाचा आराखडा करण्यात आला असून भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत रहावे, असे आवाहन शिवसंत लक्ष्मण महाराज मठाचे मठाधिपती चैतन्य महाराज यांच्यासह भूमिपूजन सोहळा समिती समस्त गावकरी, सिध्देश्वर मठ, मोरंगेश्वर मठ, शिवसंत लक्ष्मण महाराज स्मारक मंदिर समिती आदींच्या वतीने करण्यात आले आहे.
वैराग्यमूर्ती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी सर्वच समाजासाठी मोलाचे कार्य केलेले असून आष्टी येथे त्यांचे भव्य गाथा मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून येत्या काळात शिवसंत लक्ष्मण महाराजांचा २५१ वा स्मृती महोत्सव होणार आहे. तोपर्यंत हे मंदिर पूर्णत्वास नेण्याचा संकल्प असून यासाठी राजस्थान आणि देगलूर येथून दगड आणण्यात येणार आहे.