Santosh Deshmukh Murder Case  (file photo)
बीड

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार

संतोष देशमुख खून खटला; न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद

पुढारी वृत्तसेवा

Santosh Deshmukh Murder Case Valmik Karad facilitator

बीड, पुढारी वृत्तसेवा : वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच हा खून झाला असून, त्याच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा सरकार पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केला, तर वाल्मीक कराडचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट होईल, असा एकही ठोस पुरावा नाही. तसेच मकोकासाठीही पुरेसे पुरावे नसल्याचा दावा आरोपीचे वकील अॅड. मोहन यादव यांनी केला.

केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची सुनावणी बीड येथे विशेष मकोका न्यायालयात व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर मंगळवारी (दि. २४) झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. मोहन यादव यांनी युक्तिवाद केला. वाल्मीक कराडच्या वकिलांनी गत सुनावणीवेळी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद करण्यात आला. जवळपास तीन तास चाललेल्या या युक्तिवादामध्ये सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रत्येक जबाबामधून वाल्मीक कराडचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सिद्ध होत नाही.

तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी आणि वाल्मीक कराड यांनी सोबत केलेला एकही गुन्हा यापूर्वीचा नाही. केवळ फोन कॉल झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे, परंतु त्यातील संभाषण मात्र स्पष्ट नाही. तसेच मूळ फिर्यादी शिवराज देशमुख याच्या स्टेटमेंटमध्ये कोठेही वाल्मीक कराडचा उल्लेख नाही. मात्र इतर जे दोन साक्षीदार आहेत, त्यांनी मात्र वाल्मीक कराडचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक पाहता अपहरण होत असताना मूळ फिर्यादी त्या ठिकाणी उपस्थित होता, परंतु तेव्हा मात्र कोणतेही संभाषण अपहरणकर्त्यांनी केल्याचे जबाबात दिले गेले नसल्याची बाब अॅड. यादव यांनी निदर्शनास आणून दिली.

तसेच अॅट्रॉसिटी, खंडणी व खून हे तीन स्वतंत्र गुन्हे आहेत. यातील अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे गुन्हे हे केज येथील कोर्टासमोर सुनावणी होणे अपेक्षित असताना पोलिसांनी मात्र स्वतःहून तीन गुन्हे एकत्रित करत चार्जशिट दाखल केलेले आहे, असा कोणताही कायदेशीर अधिकार पोलिसांना नसल्याचा दावा अॅड. यादव यांनी केला.

तसेच मकोकानुसार कारवाई करताना प्रस्ताव आणि मंजुरीच्या टप्प्यात बाल्मीक कराडचा कोणताही समावेश यामध्ये नव्हता, त्यानंतर तो करण्यात आला. तसेच मकोकासाठी जे निकष आहेत, त्या निकषामध्ये हा गुन्हा बसत नाही. वाल्मीक कराड आणि इतर आरोपी यांचा एकत्रित एकाही गुन्ह्यामध्ये संबंध आलेला नाही, असे यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख यांचे जबाब एक महिन्यानंतर नोंदवले गेले ही बाबही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

संतोष देशमुख आणि अवादा कंपनीचा काही संबंध असल्याचे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटले नाही. परंतु ६ डिसेंबरला जी मारामारी झाली, त्यावेळी संतोष देशमुख त्या ठिकाणी असल्याचे सरकार पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या जबाबात म्हटले गेले आहे.

पुरेसे पुरावे असल्याचा दावा

सरकार पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. वाल्मीक कराड हाच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच सुदर्शन घुले आणि इतरांनी हा खून केला. त्यामुळे त्याला दोषमुक्त करू नये, असे निकम म्हणाले. तसेच तीन गुन्हे एकत्रित करण्यावरून त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट, कोल्हापूर बाल हत्याकांड या प्रकरणाचा संदर्भ देत गुन्हे एकत्र करणे योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर असलेले गुन्हे व त्यासंबंधी असलेले पुरावे पुरेसे असल्याचेही निकम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT