Purushottam Puri Temple Majalgaon
पद्माकर देशमुख / शिवनाथ जाधव
बीड : बीडपासून ७० किमी अंतरावर भारतातील एकमेव पुरुषोत्तमपुरीचे मंदिर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्याचे काम सुरु असून त्यामुळे परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यापासून 22 किमी अंतरावर पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी काठावर मंदिर आहे.
माजलगावातील पुरुषोत्तमपुरी मंदिराची आख्यायिका काय?
या मंदिराची प्राचीन आख्यायिका अशी की, पूर्वी शार्दुल नावाचा राक्षस या भागातील जनतेला त्रास देत होता. भगवान विष्णु यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले, म्हणून तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात. या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाची चार फूट मूर्ती आहे. माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्षेक्ष्वराची महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात आहे. या गाभाऱ्याची प्रतिकृती वृंदावनातील कृष्ण मंदिरातील कृष्ण मंदिराची सारखी असून दोन्ही मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत. स्थापत्य कलेचे दर्शन या परिसरात घडते.
यादवकाळात निर्मिती
इ.स.वी. 1310 मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळेच या मंदिराचं नाव पुरुषोत्तम पुरी असे पडले. पूर्वी या परिसरात ऋषी-मुनीनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. अधिक मासात येथे स्नान, दान आणि पुरुषोत्तम दर्शन केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. असेही सांगितले जाते की, या मंदिराचा परिसर धार्मिक शिक्षण आणि वैदिक अध्ययनासाठी प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले, मात्र भाविकांची श्रद्धा कायम राहिली.
1980 साली ह.भ.प. श्री भानुदास महाराज, लक्ष्मण रत्नपारखी तसेच महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या उपस्थितीत मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.तथापि अलिकडच्या काळात होणारी गर्दी आणि महत्व पाहता मंदिराचे काम पुन्हा नव्याने हाती घेण्यात आले आहे. यासाठी 54 कोटी 56 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
काम चालू असल्यामुळे सध्या भाविकांना पत्र्याच्या शेड मधूनच भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घ्यावे लागते. यंदा 17 मेपासून अधिक मास प्रारंभ झाला असून,15 जूनपर्यंत चालणार आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत असून वाढते तापमान, उन्हाचा तडाखा आणि अपुरी जागा यामुळे प्रशासनासमोर गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मंदिराच्या जीणोंद्वारात आधुनिक सिमेंट काँक्रीटपेक्षा पारंपरिक स्थापत्यकलेला प्राधान्य देण्यात आले आहे. राजस्थानहून विशेष दगड मागवून त्यावर कोरीवकाम करण्यात येत आहे. मंदिराचे खांब, कमानी, झरोके, दगडी भिंती आणि शिल्पकला यामध्ये प्राचीन भारतीय मंदिर वास्तूशैलीची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, जुन्या मंदिराची मूळ ओळख कायम ठेवत नव्या स्वख्यात त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी केवळ श्रद्धास्थान न राहता ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्याही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
महालक्ष्मी मंदिर
किट्टी आडगाव आणि पुरुषोत्तम पुरी हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असून पुरुषोत्तम पुरी येथे भगवान पुरुषोत्तम आणि किट्टी आडगाव येथे महालक्ष्मी मंदिर असून आपण बालाजीच्या दर्शनाला गेल्यानंतर करवीर निवासी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्यानंतर यात्रेचे पूर्ण फळ मिळते तसेच येथे आहे भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनानंतर किट्टी आडगाव निवासिनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनाने भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे फळ मिळते तीच आख्यायिका येथे पण लागू होते.