Purchased a luxury car from pomegranate earnings
शरद रेडेकर
आष्टी : पारंपरिक पिकांबरोबरच फळबागांची लागवड आणि आधुनिक शेती तंत्राचा अवलंब केल्यास शेतीही अत्यंत फायदेशीर ठरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण धामणगाव येथील प्रगतिशील शेतकरी बबन अण्णा चौधरी यांनी घालून दिले आहे. दीड एकर क्षेत्रात शरद किंग-3 जातीच्या डाळिंबाची बाग फुलवत त्यांनी अवघ्या पहिल्याच प्लॉटमध्ये तब्बल 23 लाख रुपयांचे उत्पादन घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या उत्पन्नातून त्यांनी आलिशान चारचाकी गाडीच खरेदी केल्याने याची चर्चा होत आहे.
माळरानावरील दीड एकर क्षेत्रात सुमारे 600 डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा अधिक वापर, नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन आणि बागेची सातत्यपूर्ण निगा यामुळे डाळिंबाचा दर्जा उत्कृष्ट राहिला. परिणामी बाजारपेठेत त्यांच्या फळाला चांगला भाव मिळाल्याने विक्रमी उत्पादनाचा टप्पा गाठता आला.
याबाबत बोलताना शेतकरी बबन चौधरी म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आंतरपिकांसह डाळिंबासारख्या फळबागांकडे वळले, तर निश्चितच आर्थिक प्रगती साधता येईल. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो आणि बाजारातही अधिक दर मिळतो. दरम्यान, या डाळिंब बागेच्या उत्पन्नातून त्यांचे चिरंजीव संपत चौधरी यांनी तालुक्यातील पहिली टाटा सियारा खरेदी केल्याचे सांगितले.
शेतीमधूनही मोठे आर्थिक यश मिळवता येते, हा विश्वास चौधरी कुटुंबाने आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवला असून त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकरी कौतुक करत आहेत.