धारूर ः शहरासह ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायतीने व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विशेषतः प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा, बसस्थानक परिसर, तसेच वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धारूर पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आले होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थान नायब तहसीलदार दळवी यांनी भूषविले. यावेळी नायब तहसीलदार प्रकाश गोपड हेही उपस्थित होते. धारूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याने साजरे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, वादग्रस्त घोषणा, आक्षेपार्ह फलक किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृती टाळाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सीसीटीव्हीमुळे चोरी, छेडछाड, भांडणे तसेच अपघातांच्या तपासात पोलिस प्रशासनाला मोठी मदत होते, असेही वाघमोडे यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नागरिकांनी विविध सूचना मांडल्या.
उत्सव काळात मिरवणूक मार्ग, ध्वनिप्रदूषण, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी सर्व उपस्थितांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. शांततेत आणि सामाजिक सलोख्याने शिवजयंती व आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीस शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.