परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात पोलीस वेगाने तपास करीत असुन तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. या अनुषंगानेच आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार आंधळे यांच्या खून प्रकरणात ग्यानबा उर्फ गोटया मारोती गित्तेच्या तक्रारीवरून बबन गित्तेसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक विषयाच्या वादातून ही घटना घडली होती. बीड जिल्ह्यात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असुन पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी मोहीम गतिमान केली आहे. मुख्य आरोपी व इतर आरोपींना फरार होण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध करून देणे तसेच इतर मदत केल्याप्रकरणी आसाराम दत्ता गव्हाणे (वय २३), मयूर सुरेश कदम (वय २९), रजतकुमार राजेसाहेब जेधे (वय २७), अनिल बालाजी सोनटक्के (वय २३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व पोलिसांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपींना फरार करण्यासाठी मदत केलेल्या चौघांना केज आणि धारूर पोलिसांनी अटक करून त्यांना परळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.