परळी : परळी येथील तुकाराम मुंडे हे वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. चार जूनला तिघांनी त्यांना चारचाकी वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले होते. पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या सुटकेनंतर आता पुढे आली आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराला धोत्रा (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) परिसरात सात जूनला डोळ्यांवर पट्टी बांधून रस्त्याच्या कडेला सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परळीला आणून सुखरूप कुटुंबीयांकडे दिले. दरम्यान अप-हरणातून सुटका झालेल्या परळीच्या तुकाराम मुंडे यांनी घडलेला थरार व जीवावर बेतलेली जीवघेणी कहाणी सांगितली आहे. या अपहरण नात्याची संपूर्ण 'आपबिती' त्यांनी सांगितली आहे.
चार जूनला दुपारी काम आटोपून घरी परतत असताना तिघांनी त्यांना चारचाकी वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यांच्या पुतण्याने लगेचच पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला तसेच त्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. बीड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास सुरू केला. संशयितांचा ठिकठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अशात तुकाराम मुंडे वर्ध्यात सापडले
तुकाराम मुंडे यांना वर्धा जिल्ह्यातील धोत्रा परिसराजवळील एका निर्जन ठिकाणी डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सात जूनला सोडण्यात आले. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. त्याचवेळी दुचाकीवरून जात असलेले आंजदा (जि. वर्धा) येथील प्रसन्ना घेमराज मांडवकर यांनी त्यांना पाहिले आणि तातडीने मदतीचा हात दिला. प्रसन्ना मांडवकर यांनी तत्परता दाखवत त्यांना आपल्या दुचाकीवरून हिंगणघाट पोलिस ठाण्यात नेले. हिंगणघाट पोलिसांनी मुंडे यांच्या कुटुंबीयांसह परळी पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तुकाराम मुंडे यांना परळी येथे आणण्यात आले.
चारचाकीमध्ये डांबताच दिली दोन इंजेक्शन
परळी औष्णिक विद्युत केंद्र पासून काही अंतरावर अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंडे यांना गाडीत डांबून नेले. रिवाल्वरचा धाक दाखवला. काही अंतरावर गेल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे बदलायला लावून टी-शर्ट घालायला दिला. डोळ्याला काळी पट्टी बांधलेली असतानाच त्यांना अपहरणकर्त्यांनी दोन इंजेक्शन दिली. त्यामुळे नंतर काय घडत आहे याची शुद्ध त्यांना राहिली नाही. अपहरण करून घेऊन जात असताना प्रवासादरम्यान तीन जणांपैकी कोणी काहीही बोलत नव्हते. त्यामुळे काही अंदाजही आला नाही.
इंजेक्शनच्या गुंगीमुळे काय घडतेय हे माझे मलाच कळले नाही असेही त्यांनी सांगितले. डोळ्यावर कळ्या पट्ट्या असलेला चष्मा घालून सर्ववेळ फिरवले . पायऱ्या चढून एका ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोलण-ारे हे अपहरणकरते असल्याचे लक्षात आले. सातत्याने सगळ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी देत होते. कितीही गयावया केल्या तरीही त्यांना दया आली नाही अशी माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली.
माझ्या सुटकेसाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. हिंगणघाट येथील पोलिसांनी सहकार्य केले. प्रसन्न मांडवकर नावाचा व्यक्ती देव माणूस म्हणून माझ्या जीवनात आला. मित्रमंडळी, नातेवाईक, सर्वांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती आरोपींकडे होती. माझ्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांना तात्काळ मिळाली होती. त्यामुळे परळीतून कोणीतरी त्यांना मदत करत होते, हे स्पष्ट आहे. मुख्य आरोपींसह त्यांना माहिती पुरवणाऱ्या सूत्रधारांनाही पोलिसांनी शोधून काढावे अशी आपली मागणी आहे.तुकाराम मुंडे, अपहरणकर्ते