Manoj Jarange Patil Narayangad Melawa
बीड, पुढारी वृत्तसेवा : मंत्री पंकजा मुंडे यांनी हैदराबाद गॅझेट हे गुलामगिरीचे गॅझेट आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला.
त्या नाकतोडीला मी बोललो का, नाही बोललो. गुलामीचं गॅझेट लागू केलं म्हणजे लेकरंसुद्धा गुलाम समजता का? अग बाई लय बोलता येतं सगळ्याला, मापात राव्हा... असे म्हणत आमच्या वाटेला गेल्यात तर घरात घुसून मारू असा इशाराही त्यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील, महंत मेंगडे महाराज यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही म्हणलो का, तुम्ही म्हणता आमच्या आरक्षणासाठी लागू केलेले गुलामीचे गॅझेट आहे. खरं तर तुम्ही राजस्थानला होते, तिकडे अकबर बादशहा होते, त्याने दांडक्याने ठोकले तुम्हाला, मग इकडे पळून आलात आणि मग तुम्ही निजामाचे जनावरं सांभाळणारे बनलात, व्यापारी म्हणून आलात आणि राज्यकर्ते बनलात, चला व्हा माघारी...
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, गुलामीचे गॅझेट लागू केलं म्हणजे लेकरंसुद्धा गुलाम समजता का? जे जे तिच्यासंगं पक्षात काम करतेत, त्यांनी स्वाभिमान जागा ठेवावा, आमचे निझामांचे गुलामीचे गॅझेट आहे, मग तुम्ही इंग्रजांचे गॅझेट घेतले. इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? १९३१ ची जणगणना घेतली, त्याचं आरक्षण घेतलं. इंग्रजाच्या जनगणनने आरक्षण दिलं, मग तुम्ही कोण? असं आम्ही म्हणायचं का, म्हणलो नाही. आपूण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणायचे का? तुम्ही डायरेक्ट म्हणले, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या संकटावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, महापुराने शेतकरी पार मेटाकुटीला आला असून, त्याला पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने आता कर्जमुक्ती द्यावी, नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी सत्तर हजार रुपये द्यावेत. तसेच त्याचे कर्ज मुक्ती झालीच पाहिजे ..!
महापुरामुळे माझा शेतकरी पार कोलमडला असून, त्याला आता खरी आधाराची गरज आहे. यासाठी शासनाने त्याला दिवाळीपूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत दिली पाहिजे. असे सांगताना ७० हजार प्रतिहेक्टर ही मदत ज्या शेतकरयाचे पीक वाहून गेले त्याला द्यावी. ज्याची जमीन खरडून गेली त्याला हेक्टरी एक लाख तीस हजार रुपये द्यावे, तर ज्या शेतकरयाचे पशुचन, घर, संसार, तसेच त्याचे काहीच राहिले नाही अशा शेतकरयाचा पंचनामा तो सांगतो त्याच पद्धतीने आणि पूर्ण नुकसान भरपाई देणारा झाला पाहिजे. हे सगळे करताना या शेतकरयाची संपूर्ण कर्जमुक्ती शासनाने करावी. दिवाळीपूर्वी हे सारे करावे अन्यथा राज्यातील एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी जाहीर सभेतून दिला.
.. तर घरात घुसून मारू
भगवान गडावरील मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबद्दल बोलताना, असे किती आले आणि किती गेले, त्यांना आम्ही आधीच जागा दाखवली असून, आता आमच्या वाट्याला जर गेलात तर घरात घुसून मारू, असा इशारा त्यांनी देताना मराठ्यांनी खूप सहन केले. तब्बल ३६ वर्षांपासून आम्ही तुम्हाला सहन करत आहोत. आता आमच्या वाट्याला जायचं कारण नाही, असे मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांना दम दिला तर आमच्यामुळे ज्याचं सगळंच गेलं त्याने आम्हाला फुशारकी मारू नये, असा टोला धनंजय मुंडे यांनाही त्यांनी यावेळी लगावला.