Malshej Highway pudhari photo
बीड

Malshej Highway : कोट्यवधींचा राष्ट्रीय महामार्ग खचला

निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

टोकावडे : मुकेश शिंदे

माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील कदमपाडा ते सावर्णे दरम्यान नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण होऊन काहीच महिने उलटत नाहीत तोच पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे. काही दिवसांपुर्वीच धानिवली ब्रीजवरील रस्ता खचला असल्याची घटना घडली होती. तसेच मुरबाडच्या उड्डाणपुलाला देखिल तडे गेल्याची घटना समोर आली होती. मात्र मागील चार पाच दिवसांपासुन तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर सुरु होता. त्यामुळे मोरोशी ते सावर्णे दरम्यान तब्बल चार ते पाच ठिकाणी रस्ता खचल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने अतिघाईत काम पूर्ण केल्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला. त्यातच संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेची योग्य तपासणी न करता दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. परिणामी, खचलेल्या भागातून जाणारी वाहने अक्षरश: उडत असून कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खचलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्ता आणखी खचून वाहने अडकण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.

सध्या पावसाळा सुरू असून माळशेज परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत हा धोकादायक रस्ता प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पहिल्याच पावसात खचलेल्या या महामार्गासाठी जबाबदार कोण? दोषी अधिकारी का ठेकेदार असा सवाल या ठिकाणी उपस्थीत केला जात आहे.

लोखंडी डिव्हायडरही खचले

रस्त्याच्या निकृष्ट कामाचे आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी सुरक्षा डिव्हायडरही पहिल्याच पावसात खचल्याचे दिसून येत आहे. डिव्हायडर उभारताना मजबूत सिमेंट काँक्रीटचा पाया देण्याऐवजी केवळ माती टाकून काम उरकण्यात आले. परिणामी, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून गेली आणि अनेक ठिकाणी डिव्हायडर वाकले तसेच खचले आहेत.

या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांनी वाहन बाजूला घेतल्यास ते थेट खचलेल्या डिव्हायडरच्या दिशेने जाऊन मोठ्या अपघाताला सामोरे जाऊ शकतात. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात हा धोका अधिक वाढत असून अवजड वाहनांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरत आहे. केवळ कागदोपत्री दर्जेदार काम दाखवून प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT