माजलगाव : माजलगाव जलाशयातील शासकीय मत्स्यबीज सोडण्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शासकीय नोंदीनुसार अपेक्षित जातींचे मासे आढळून न आल्याचा दावा तक्रारदार अंकुश रामभाऊ बलिया यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2026 रोजी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजलगाव तालुक्यातील फुल पिंपळगाव परिसरात प्रत्यक्ष तपासणी केली. ही कारवाई तक्रारदार अंकुश बलिया यांनी मत्स्य आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. यापूर्वी त्यांनी वर्ष 2025 मध्ये जलाशयात शासकीय मत्स्यबीज प्रत्यक्षात न सोडता खोटे अहवाल व कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला होता.
मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चार मच्छीमारांच्या माध्यमातून जाळी टाकून तपासणी केली. या तपासणीत गावठी जातीचे मासे, चिलापी, भड, चांभरी, शिंगाडा व राहू हे मासे मिळाल्याची नोंद करण्यात आली. मात्र, शासकीय नोंदीनुसार जलाशयात सोडण्यात आल्याचा दावा असलेले कटला, मृगळ, सुपरनेस आणि राहू जातीच्या मत्स्यबीजांपासून तयार झालेले मासे अपेक्षित प्रमाणात आढळून न आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या तपासणीवेळी तक्रारदार अंकुश बलिया, संबंधित ठेकेदार तसेच महिला व पुरुष मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणात आणखी आठ दिवस तपासणी होणार असून, 17 जुलै रोजीची कारवाई ही पहिली प्रत्यक्ष तपासणी होती.
या तपासणीचा पंचनामा व अहवाल पुढील कारवाईसाठी मत्स्य आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अंकुश बलिया यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या संपूर्ण प्रकरणाकडे मच्छीमार, मत्स्य विभाग आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले असून, पुढील तपासणीत काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.