शिवनाथ जाधव
टाकरवण : माजलगाव तालुक्यात चालू खरीप हंगामात पावसाने पाठवल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी तालुक्यातील खरीप पिके अक्षरशः करपून पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासकीय आकडेवारीनुसार, तालुक्यात ६२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके संकटात सापडली असून, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
पावसाची मुख्य वैशिष्ट्ये आणि पिकांची सद्यस्थिती भौगोलिक व लागवड क्षेत्र: माजलगाव तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८९ हजार ६९३.५७ हेक्टर असून, त्यापैकी ७८ हजार ७७८.३२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उसासह इतर मुख्य पिकांची पेरणी केली होती. मात्र, ऐन वाढीच्या काळात पावसाने दगा दिल्यामुळे पिके हातची गेली आहेत. तालुक्यात सोयाबीन (३०,६२४ हेक्टर) आणि कापूस (२९,५८९हेक्टर) या दोन प्रमुख नगदी पिकांचे सर्वाधिक क्षेत्र असून, पावसाअभावी ही दोन्ही पिके पूर्णपणे जळून गेली आहेत.
टंचाईसदृश परिस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेतलेले कर्ज, बियाणे आणि खतांचा खर्च मातीमोल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
या भीषण दुष्काळी परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.