ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  Pudhari Photo
बीड

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती. परळी येथे सर्व संघटनांनी एकत्रित येत २५ फेब्रुवारीरोजी ब्राह्मण ऐक्य परिषदही घेतली होती. या ऐक्य परिषदेनंतर ही मागणी ताकदीने शासन दरबारी करण्यात आली. अखेर या मागणीला यश आले असून आज (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या, चर्चा केल्या. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, ही मागणी लावून धरण्यात आलेली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भाने ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची विशेष बैठक घेऊन चर्चा केली.

अमृत संस्था कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्राह्मण समाजासाठी आता अमृत संस्थेच्या सर्व लाभांबरोबरच स्वतंत्रपणाने आर्थिक विकास महामंडळ ही स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाला ५० कोटी रुपये इतकी भरीव निधीची तरतूदही राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या निर्णयाचे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे. सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

परळीत झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेनंतर मुद्दा ताकदीने आला ऐरणीवर

दरम्यान, परळी वैजनाथ येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाज संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी ब्राह्मण ऐक्य परिषद घेतली होती. संपूर्ण राज्यभरात ही ब्राह्मण ऐक्य परिषद गाजली होती. त्यानंतर शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून अखेर या संपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले.

महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्यासाठी सकल ब्राह्मण समाज कृतज्ञ आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी अमृत संस्थेचे सर्व लाभही संरक्षित करण्यात आले आहेत. खासदार सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांनी ब्राह्मण समाज व सरकार या दोहोतील दुवा म्हणून काम केले. महामंडळ स्थापन झाल्याने हा एक इतिहास बनला आहे. ही बाब कृतज्ञा व कृतार्थ करणारी अशीच आहे.
बाजीराव धर्माधिकारी, ब्रह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT