कडा : येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत पीककर्जासंदर्भातील कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कथित मनमानी कारभाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः पीककर्ज व कर्जमाफीसंदर्भात माहिती घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना फील्ड ऑफिसरकडून अपमानजनक वागणूक दिली जात असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून होत आहे.
पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जमाफीची स्थिती तसेच कर्जखात्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत. मात्र,फील्ड ऑफीसर पाटील यांच्याकडून त्यांना समाधानकारक माहिती अथवा मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही कामे विशिष्ट व्यक्तींच्या माध्यमातून किंवा खाजगी एजंटांच्या हस्तक्षेपातूनच वेगाने होत असल्याची चर्चाही शेतकऱ्यांमध्ये आहे.
‘तोंड पाहून कामे’ होत असल्याचा आरोप...
बँकेतील कामकाजात सर्व शेतकऱ्यांना समान वागणूक मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही ग्राहकांची कामे तत्काळ केली जातात,तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र वारंवार बँकेत चकरा माराव्या लागतात, असा आरोप शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खाजगी एजंटांचा सुळसुळाट?
शेतकऱ्यांच्या बँकिंग कामांमध्ये खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रारही पुढे आली आहे. बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यां मार्फत होणारी कामे बाहेरील व्यक्तींच्या माध्यमातून होत असतील तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची सुरक्षितता आणि गोपनीयतेचाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.
शाखाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी
या संपूर्ण प्रकाराकडे कडा एसबीआयच्या शाखाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात, तसेच फील्ड ऑफिसरच्या कामकाजाची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या पीककर्ज आणि कर्जमाफी संदर्भातील प्रश्न तातडीने सोडवावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुजोर फील्ड ऑफीसर पाटील यांची चौकशी करून कारवाई करावी : ज्ञानेश्वर चौधरी
“पीककर्ज आणि कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शेतकरी बँकेत येतात. मात्र,त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने वागणे योग्य नाही. खाजगी एजंटांचा हस्तक्षेप आणि तोंड पाहून कामे होत असल्याच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मुजोर पाटील नामक अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी,”नसता बँकेच्या दारात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी होणार का?
पीककर्ज, कर्जमाफी, कागदपत्रांची पूर्तता आणि कर्जखात्याशी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकेत जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.खाजगी व्यक्तींचा बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्यास त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती तपासावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे?