

कुर्ला: कुर्ल्याच्या कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय महिलेने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास लावत आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने ही आत्महत्या केल्याचे समोर आले असून याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी महिलेच्या पतीसह तिची सासू आणि नणंद अशा तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस यामध्ये अधिक तपास करत आहेत.
मूळची बिहार येथे राहणारी यातील मयत महिला हिचा दोन वर्षांपूर्वी कुर्ला कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या इम्रान याच्यासोबत विवाह झाला होता. महिलेचे वडील गरीब असल्याने त्यांनी लग्नात हुंडा दिला नव्हता. त्यामुळे लग्नानंतर तिला सासू आणि नणंदेकडून नेहमी हुंड्यासाठी त्रास दिला जात होता.
काही वेळा तिला जेवण न देता उपाशी देखील ठेवले जात होते. तर तिच्या पतीकडून देखील नेहमीच मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. यामुळे ती अनेक दिवस नैराश्यात होती.
अखेर ५ ऑगस्टला घरात कोणी नसताना तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिला यावेळी तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. रौनकचे माहेर बिहार असल्याने तिच्या माहेरी ही बाब समजताच त्यांनी तत्काळ कुर्ला येथे धाव घेतली.
पती, सासू आणि नणंदेकडून होणारा त्रास तिने अनेकदा तिच्या वडिलांना आणि बहिणीला सांगितला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात धाव घेत, सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार महिलेचा पती इम्रान सासू आणि नणंद विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.