Horrific Motorcycle-Car Accident; Young Man Dies
गेवराई, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील धोंडराई येथील प्रतिष्ठित नागरिक भारत मामा गुंजाळ यांचा तरुण मुलगा वैभव भारत गुंजाळ याचे आज अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेने धोंडराई गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
वैभव हा मोटारसायकलवरून जात असताना गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी जवळ गुरुवार, दि. २४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. स्विफ्ट कारने धडक दिल्याने वैभव भारत गुंजाळ (वय १८) यांचे निधन झाले तर सोबत असलेल्या गेवराई तालुक्यातील सुशी येथील कृष्णा ज्ञानेश्वर जाधव (22) हे देखील जख्मी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात अत्यंत भीषण होता, ज्यामध्ये वैभवला आपले प्राण गमवावे लागले. एक उमदा, मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून वैभवची गावात ओळख होती. ऐन उमेदीच्या काळात काळाने त्याच्यावर झडप घातल्याने गुंजाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. वैभवच्या पश्चात त्याचे आई-वडील, भावंडे आणि मोठा परिवार आहे. वैभव भारत गुंजाळ याच्या पार्थिवावर गुरुवार, दि.२४ एप्रिल रोजी रात्री उशिरा धोंडराईत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.