Fund of Rs 150 crore for Ahilyanagar-Beed-Parli railway line
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या 'अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ' या महत्त्वाकांक्षी ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने आज आणखी वेग देत १५० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या निधी वितरणामुळे बीडकरांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची मोठी भेट मिळाली आहे.
या निधीच्या मदतीने प्रकल्पाच्या कामांना आणखी वेग मिळणार असून, १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ऐतिहासिक मुहूर्तावर 'बीड-अहिल्यानगर' या टप्प्यातील रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे दशकांपासूनचे स्वप्न आता साकार होणार आहे.
पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या रेल्वे, रस्ते व विमानतळ विकासाला प्राधान्य दिले. विभागीय, जिल्हास्तरीय व मंत्रालयीन पातळीवर सतत बैठका घेऊन प्रभावी समन्वय साधत हा प्रकल्प गतीमान केला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गामुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी नवे संधीचे दरवाजे उघडणार आहेत. गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईट आणि वाहतूक सुलभ होईल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाट माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे, असा विश्वान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल आहे.
हा रेल्वेमार्ग २६१ किलोमीटर लांबीचा असून त्याचा एकूण खर्च ४,८०५ कोटी रुपये आहे. राज्य सरकारचा आर्थिक सहभाग ५० टक्के (२,४०२ कोटी रुपये) इतका आहे. यातील २,०९१ कोटी २३ लाख रुपये आजपर्यंत वितरित करण्यात आले आहेत. त्यात आज नव्याने १५० कोटींची भर घालण्यात आली आहे. हा निधी २०२५-२६ आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.