लिंबागणेश : राष्ट्रीय महामार्ग 548 डी अहिल्यानगर-अहमदपूर मार्गावरील लिंबागणेश परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. भालचंद्र विद्यालयाजवळ शुक्रवारी मध्यरात्री कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.15) रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास टाटा विस्टा कार (क्र. एमएच 05 एएक्स 0388) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच 44 एए 6226) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीवरील बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेनंतर दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. विठ्ठल राठोड व पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.गेल्या काही वर्षांत या महामार्गावर अनेक जण मृत्युमुखी पडले असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अपघात होतात, जीव जातात, काही दिवस चर्चा होते आणि पुन्हा सर्व काही शांत होते. मात्र निष्पाप कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतात. प्रशासनाने जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महामार्ग ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’
लिंबागणेश परिसरातील राष्ट्रीय महामार्ग 548 डी वर सातत्याने अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. विशेषतः भालचंद्र विद्यालय परिसरात वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याने हा भाग अपघातप्रवण ठिकाण बनला आहे. रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशव्यवस्था, वेगमर्यादा फलकांचा अभाव, गतिरोधक नसणे आणि वाहतूक नियंत्रणाची कमतरता यामुळे दर काही दिवसांनी भीषण अपघात घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
पोलिसांचा थांबा करण्याची मागणी
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांच्या गस्ती पथकासाठी कायमस्वरूपी थांबा उभारण्याची मागणीही स्थानिकांकडून वारंवार केली जात आहे. तसेच भालचंद्र विद्यालय परिसरात तातडीने गतिरोधक बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, वेगमर्यादा फलक लावणे, प्रकाशव्यवस्था सुधारणे आणि धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.