Due to lack of roads, the school is under a tree at Beed
टाकरवण, पुढारी वृत्तसेवा: टाकरवण येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी उभा करून उभारलेली सुसज्ज इमारत तालुक्यात आदर्श ठरत असताना, याच केंद्रांतर्गत दत्तनगर वस्ती शाळेची परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. पक्की इमारत असतानाही रस्ता बंद झाल्याने तब्बल महिनाभर विद्यार्थ्यांचे वर्ग लिंबाच्या झाडाखाली भरत आहेत. अंगणवाडीसुद्धा बंद असून, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
टाकरवणपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तनगर शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३४ विद्यार्थी शिक्षण घेतात. कैलास शिंदे यांच्या दानशूरतेतून मिळालेल्या सहा जागेवर सुसज्ज शाळा उभी आहे; परंतु रस्ता बंद झाल्याने शाळेची इमारत निरुपयोगी ठरत आहे. विद्यार्थी रोज सकाळी लिंबाच्या झाडाखाली बसून घडे घेतात, त्याच ठिकाणी अल्पोपहार घेतात. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृह वापरणे शक्य नाही, आज गुंठे ारपणाची भीती विद्यार्थ्यांवर कायम.
शाळेच्या आसपास लोकवस्ती वाढत असून अनेकांनी पक्की घरे उभारली आहेत. या घरबांधणीदरम्यान शाळेत जाणारा मुळ रस्ता अडवला गेला. परिणामी विद्यार्थ्यांना इमारतीपर्यंत पोहोचणे अशक्य बनले आहे. समस्या महिना उलटूनही तोच तिथे प्रशासनाने कानाडोळा केल्याची भावना पालकांमध्ये तीव्र आहे. महिनाभरापासून विद्यार्थ्यांना उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत असून या बरोबरच उघड्यावरच शालेय पोषण आहार घ्यावा लागत आहे, त्यातच पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे.
शिवाय उघड्यावर बसल्याने उन्हाचा त्रास पावसाची भीती हि आहेच. या परिसरात अडगळ असल्याने साप, विंचू यासारख्या कीटकांची देखील भीती आहेच. शाळेच्या रस्त्याविषयीचा सकृतदर्शनी अहवाल संबंधित शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्याकडून घेऊन गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना पाठवला आहे असे माजलगाव गटशिक्षणाधिकारी महामुनी यांनी सांगितले.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
लाखो रुपयांची इमारत असूनही विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागणे हे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते. बालकांच्या मूलभूत शिक्षणाचा प्रश्न असताना संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या मार्गी लावण्यात केलेला विलंब गंभीर मानला जात आहे.