धारुर : तीन लाख रुपये हुंडा आणावा, अन्यथा नांदवणार नाही, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी धारूर पोलिसांनी पती, सासू, दोन दीर, जाऊ आणि नणंद अशा सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सना राहील पठाण (वय 21) यांनी धारूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 12 मे 2024 रोजी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे राहील रसूल पठाण याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला काही काळ चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती व सासरच्या मंडळींनी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून वारंवार शिवीगाळ, मारहाण व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने हा प्रकार माहेरच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी मागणी कायम ठेवत विवाहितेला घरातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, तीन लाख रुपये न दिल्यास नांदवणार नाही व घरी आल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. लग्नावेळी माहेरकडून देण्यात आलेले सोन्याचे दागिनेही सासरच्यांनी परत दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी धारूर पोलिसांनी पती राहील रसूल पठाण, सासू शाहीन रसूल पठाण, दीर सोहेल रसूल पठाण, सादहिल रसूल पठाण, जाऊ आलिशा सोहेल पठाण (रा. इस्लामपुरा, परळी) तसेच नणंद मुस्कान नविद सय्यद (रा. खासबाग, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.