अतुल शिनगारे
धारूर : सायकलवरच धार लावण्याचे चक्र बसवून हॉटेल, सलून, टेलरिंग व्यावसायिक तसेच घरगुती वापरातील सुरी, कात्री, विळा आणि इतर धारदार अवजारांना धार लावण्याचे काम करणारे हे कारागीर आजही आपला पारंपरिक व्यवसाय जिवंत ठेवून आहेत.
आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने हे काम काही क्षणांत होत असले, तरी अनेक ग्राहक आजही त्यांच्या हातातील कसबावर विश्वास ठेवून अवजारांना धार लावून घेतात. धार लावण्याची ही कलाच या कारागिराच्या संसाराचा भार उचलत आहे. यासाठी मात्र त्यांना गावोगाव भटकंती करावी लागते.
कारागिर बाबासाहेब पांचाळ सांगतात की, एकेकाळी गावोगावी या व्यवसायाला मोठी मागणी होती. मात्र, बदलत्या काळासोबत आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि पारंपरिक व्यवसायाची बाजारपेठ कमी झाली, उत्पन्नही घटले. सुमारे वीस वर्षांपासून धार लावण्याचा व्यवसाय करणारे बाबासाहेब पांचाळ (आसोला) यांनी यापूर्वी सुतारकामासह शेतीसाठी लागणारी विविध अवजारे तयार करण्याचे काम केले. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा व्यवसाय जवळपास बंद पडला.
त्यानंतर काही वर्षे ऊसतोडणी करून त्यांनी कष्टाच्या पैशातून दोन एकर जमीन खरेदी केली. सध्या आठवडी बाजारात सुरी, कात्री, विळा आदी अवजारांना धार लावून त्यांना दिवसाला सुमारे 400 ते 500 रुपयांचे उत्पन्न मिळते. याच उत्पन्नातून घरखर्च भागवत ते स्वाभिमानाने जीवन जगत आहेत.