बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. ही केस कशी थांबवता येईल, यासाठी मला आणि माझ्या नातेवाईकांना सतत वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत आहेत, असा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे रीतसर तक्रारही दाखल केली असून, आरोपींकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
बीड येथील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी येत आहेत. या फोनच्या माध्यमातून खटला कमकुवत करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र, आम्ही अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. ज्या क्रमांकावरून फोन येत आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत. या धमक्यांमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास व्हावा आणि आम्हाला संरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई सुरू आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाला धमकावण्याचे सत्र सुरू झाल्याने, तपासावर किंवा साक्षीदारांवर परिणाम करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
न्यायालयातील कायदेशीर लढाई एकीकडे सुरू असतानाच, बाहेर सुरू असलेल्या या दबावामुळे मसाजोग परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.