Deputy Engineer Suspended for Releasing Payment Without Work Being Done
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : शाळेचे काम न करता सुमारे पाच लाख रुपयांचे देयक सादर आष्टीचे प्रभारी केल्याप्रकरणी उपअभियंता मधुकर निंबाळकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, विशेष म्हणजे निलंबनाची बातमी समोर येताच संबंधित शाळेच्या कामांना अचानक वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शाळेच्या बांधकामाचे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले नसतानाही उपविभागाकडून सुमारे पाच लाख रुपयांचे बिल सादर करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनी चौकशीचे आदेश दिले.
प्रभारी कार्यकारी अभियंता मोमीन यांनी केलेल्या तपासणीत संबंधित काम झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारे २८ मार्च रोजी मधुकर निंबाळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मार्च अखेरीस बिले काढण्याच्या घाईत अशा प्रकारचे बोगस व्यवहार होत असल्याचे यापूर्वीही समोर आले होते; मात्र थेट उपअभियंत्याविरुद्ध झालेली ही कारवाई धक्कादायक मानली जात आहे.
या प्रकरणाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कारवाईवर न थांबता सर्व प्रलंबित कामांची तपासणी करून पारदर्शकता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा बोगस बिलांच्या प्रकरणामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय सुरूच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
या कारवाईमुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी, ही केवळ एक घटना नसून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गैरप्रकारांचे हे संकेत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
बोगस बिलांचे जाळे उघड होण्याची गरज
मार्च अखेरीस निधी संपविण्याच्या घाईत अपूर्ण किंवा न केलेल्या कामांची बिले काढण्याचे प्रकार जिल्ह्यात वारंवार घडत असल्याचे बोलले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातही अशा तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत.
कारवाईनंतर काम
तवलवाडी येथील शाळेच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई होताच, त्या ठिकाणी छप्परपत्रे बसविणे, रंगरंगोटी, शाळेसमोरील परिसराची कामे आदी कामांना अचानक गती मिळाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे 'काम आधी की बिल आधी?' असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.